News 34 chandrapur
राजुरा - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ग्रामजीवनाच्या उत्थानाचा विचार दिला. त्याकरीता आपले गाव तिर्थक्षेत्र समजून प्रत्येक व्यक्तीने गावाच्या विकासासाठी त्याग व सहयोग वृत्तीने झटले पाहिजेत. त्याबरोबर स्वतः व्यसनमुक्त जीवन जगले पाहिजे. ग्रामसेवेचे व्रत जोपासून राष्ट्रसंतांच्या विचारांनी सदैव पुढे गेले पाहिजेत असे प्रतिपादन माजी आमदार तथा ज्येष्ठ विचारवंत ऍड . वामनराव चटप यांनी केले. ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने मानोली (बु. )येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. Gurudev seva mandal
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. केंद्रीय प्रचार समिती सदस्य एड. राजेंद्र जेनेकर, जिल्हा प्रचार प्रमुख लुटारू मत्ते गुरुजी, एड. सारिका जेनेकर, जाहिर खान गुरुजी, सुभाष पावडे, शैलेश कावळे, अनिल चौधरी, राजकुमार चिंचोळकर, मनोहर पासपुते, गणपतराव अडवे, नारायणराव अडवे, नानाजी देवाळकर, वामनराव अडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामजयंती पर्वात परिसर स्वच्छता, प्रबोधन यांसारखे उपक्रम राबविण्यार्या मानोली गावाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित वक्त्यांनी समयोचित विचार व्यक्त करून राष्ट्रसंताच्या साहित्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातून भजन गात द्वारा साहित्य दिंडी काढण्यात आली.तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन मंडळाचे मुख्य फलकाजवळ ज्येष्ठ साहित्य प्रसारक रामदास चौधरी यांनी लावले होते. याप्रसंगी खेळात प्राविण्य प्राप्त वैभव रमेश अडवे, अभियांत्रिकी पदवी प्राप्त केतन अडवे, श्रमदानाचे उत्स्फूर्त कार्य करणारे मोहन पेरकंडे, युवा ग्रामीण पत्रकार प्रकाश देवगडे (असाळा), कवयित्री सारिका जेनेकर, साहित्य प्रसारक रामदास चौधरी (राजुरा) आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामजयंती निमित्ताने गावातील मंडळींनी गाव स्च्छ करून मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. सायंकाळी सामुदायीक प्रार्थनेच्या महत्त्वावर ज़हीर खान गुरुजी यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले.रात्री सप्तखंजेरीवादक कु.क्रांती मंगेश काळे हिचे समाजप्रबोधनपर कीर्तन झाले.
