गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरोना विषाणूने हल्ली ग्रामीण भागात अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यात अगदी शेवटच्या टप्प्यावर आदिवासी बहूल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील विविध गावात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.दिवसेंदिवस रुग्णात वाढ होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. परंतू सदर केंद्र हे कोरपना आणि गडचांदूर शहरात कार्यान्वित आहे.यामुळे ग्रामीण क्षेत्रातील जनतेला तपासणीसाठी या दोन ठिकाणी जाणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.परिणामी हे स्थानिक पातळीवरच खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. गुण आले तर ठीक नाहीतर शेवटच्या क्षणी चंद्रपूरकडे धाव घेतात. मात्र बेड उपलब्ध नसल्याने उपचाराविनाच मृत्युमुखी पडतात.असे अनेक उदाहरण डोळ्यासमोर असून कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता ग्रामीण क्षेत्रातही कोविड तपासणी केंद्र सुरू केल्यास जनतेला सोईचे होईल.त्यामुळे तालुक्यात किमान चार गावात तरी नवीन तपासणी केंद्र उभारण्यात यावे.
त्याचप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कित्येक रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहे.यात काहींना स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था नसल्याने ते कुटुंबात राहतात.आणि कुटुंबातील इतर व्यक्ती त्यांच्या संपर्कात येतात.यामुळे रुग्ण वाढीस होण्याची शक्यता अधीक आहे.अशांना स्वतंत्ररित्या अलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.तसेच कोरपना तालुका व चंद्रपूरचे अंतर अंदाजे ७५ किमी असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूर रुग्णालयात ऑक्सिजन व बेड कमी पडत आहे.त्यामुळे कित्येक लोकांचे जीव जात आहे.जर कोरपना व गडचांदूर येथे कमीतकमी ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले तर तालुकावासींना सोईचे होईल. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी गर्दी कमी होईल. ही बाब गंभीरतेने घेऊन कोरपना व गडचांदूर येथे कोविड केअर सेंटरची उभारणी करावी अशा मागण्यांचे निवेदन गडचांदूर शहर भाजपाच्या वतीने तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे, सं.गां.नि.योजनेचे माजी अध्यक्ष संजय मुसळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.आता शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.