वरोरा - जाती-धर्मात गुरफटलेला समाज एकसंघ राहावा, या हेतूने प्रेरीत झालेल्या समविचारी लोकांनी सदभावना एकता मंचची Sadbhavana Ekta Manch स्थापना केली. हा मंच समाजाला दिशा देणारा ठरणार असल्याचे मत आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर Mla pratibha Dhanorkar यांनी व्यक्त केले. वरोरा येथील सदभावना चौकातील फलकाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, विधायक कार्य करणाऱ्या मंचाचीच आज समाजाला गरज आहे. हा सदभावना एकता मंच त्यात खरा उतरेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सदभावना फलकाच्या अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ऐहतेशाम अली हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे होते. अध्यक्षस्थानावरून बोलतांना नगराध्यक्ष ऐहतेशाम अली म्हणाले, आपलंही काहीतरी समाजाला देणे लागते. या उद्दात्त हेतूनेच सदभावना एकता मंच उदयास आला. हा मंच विविध समाजपयोगी कार्य करणार आहे. त्यामुळे सदैव त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जीवनात प्रत्येकानी सेवाभाव जपण्याचे भावनिक आवाहन नगराध्यक्ष ऐहतेशाम अली यांनी यावेळी केले.
नगरसेवक छोटूभाई शेख, गोपाळ गुडधे, राजकुमार गिमेकर, गुरूदेव जुमडे, धनराज आसेकर, अरूण उमरे, मिनाज अली, प्रशांत झाडे आदी समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन सदभावना एकता मंचची स्थापना केली. या एकता मंचनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. भविष्यात शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात काम करणार असल्याचा या मंचचा मानस आहे. तरूणांना योग्य दिशा मिळावी म्हणून सदभावना युवा एकता मंचचीही निर्मिती करण्यात आली. या दोन्ही सदभावना एकता मंचचे वरोरा शहरात कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे संचालन राजकुमार गिमेकर यांनी केले. आभार गुरूदेव जुमडे यांनी मानले. या कार्यक्रमाला नागरीक, प्रतिष्ठित व्यक्ती, विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर सदभावना एकता युवा मंचचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.