चंद्रपूर - सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने डेंग्यूचा प्रभाव कमी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत किटकनाशक औषधीची फवारणी नियमित केली जात आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शहर परिसरात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मागील महिनाभरापासून उपाययोजना म्हणून शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रत्येक वॉर्डात दररोज डासप्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. डेंग्यू आणि मलेरिया आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांच्या घरी असलेल्या कूलरच्या टाक्यांमध्ये 'अबेट द्रावण' टाकण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या चमूच्या माध्यमातून २१ जुलै रोजी अरिहंतनगर येथे डेंगूचा सर्वे करण्यात आला. एकूण ५० घरातील १५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १२ घरे दूषित आढळून आलीत. या परिसरातील ७ कंटेनर रिकामे करण्यात आले. ५ ठिकाणी 'अबेट द्रावण' टाकण्यात आले. एकूण १६७ कंटेनरची तपासणी करण्यात आली. एका ठिकाणी अळीनाशक फवारणीदेखील करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू डासांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विवेक नगर प्रभाग क्र. ५ मध्ये तुकूम शाळा, कृष्णा टाॅवर, गोपाल नगर, गुरुकुल गृहनिर्माण सोसायटी, साळवे कॉलनी, शिवाजी महाराज चौक, सावित्रीबाई फुले शाळा, एकता चौक, कावळे मोहल्ला, महाराष्ट्र बॅंक, मातोश्री चौक परिसरात डास प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत औषध फवारणी तसेच अबेट द्रावण टाकण्यात आले. शास्त्री नगर, एम.ई.एल. व कैम्प प्रभागात विविध स्थळावर किटकनाशक औषधीची फवारणी करण्यात आली. डेंग्यु चाचणीत पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी व आजुबाजूच्या परिसरात फवारणी करण्यात आली.
एडीस इजिप्ती डासाला खूप उंचावर उडता येत नाही आणि डेंग्यूचा मच्छर सकाळी चावतो. चावल्याच्या ३ ते ५ दिवसांनंतर रुग्णांमध्ये डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. शरीरात ही बाधा होण्यासाठी मर्यादा ३ ते १० दिवसांची पण असू शकते. त्यामुळे आतापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डेंग्यूचे मच्छर साचलेल्या पाण्यात होतात. म्हणुन घरात आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका, कूलरमध्ये असलेले पाणी २ ते ३ दिवसांमध्ये नक्की बदला, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
पावसाळ्यानंतर डेंग्यूचा प्रभाव वाढतो. पावसाळ्यात आणि त्याच्या नंतरच्या महिन्यात म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरमध्ये डेंग्यू सगळ्यात जास्त पसरतो. कारण या ऋतूमध्ये डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू तापावर प्रतिबंधासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यू रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती, मात्र पालिकेला तात्काळ उपाययोजना करण्यात बराच उशीर लागला.