कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास,या योजनेंतर्गत जि.प.ने वर्ष २०१९,२० चा अखर्चित निधी २०२०,२१ मध्ये खर्च करण्याची प्रशासकीय मान्यता ऑगस्ट २०२० मध्ये दिली. मात्र काम पूर्ण करून देखील उर्वरित १० टक्के निधी देण्यासाठी जि.प.च्या समाज कल्याण विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात असून यामुळे ग्रामपंचायतींची पंचाईत झाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठवून ग्रामपंचायतींना निधी देण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेने वर्ष २०२१-२२ मध्ये ग्रा.पं.ना निधी खर्च करण्यासाठी दिला.मार्च २०२१ पर्यंत हा निधी खर्च करण्याची मर्यादा होती.हा अल्प कालावधी असून कोरोनाची नैसर्गिक आपत्ती, रेतीघाटांचा न झालेला लिलाव व ई-निविदा याकरिता गेलेला वेळ.यामुळे ग्रा.पं.ना दिलेल्या कालावधीत कामे करणे शक्य झालेले नाही.संचारबंदीमुळे अजूनही जिल्ह्यातील अनेक ग्रा.पं.ची कामे सुरू झालेली नाही.काही ग्रा.पं.नी काम पूर्ण केले असून १० टक्के उर्वरित निधीसाठी जि.प.च्या समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याचे कळते.कामासाठी केवळ ५ ते ६ महिने वेळ देण्यात आला.
पूर्णत्वाच्या दाखल्यासह जि.प. कडे प्रस्ताव सादर केल्यानंतर ग्रा.पं. कडून प्रस्ताव येण्यास उशीर झाल्याचे जि.प.समाज कल्याण विभाग अधिकार्यांकडून सांगण्यात आल्याची माहिती असून नैसर्गिक आपत्ती व इतर प्रशासकीय अडचणींमुळे अल्पशा काळात कोणत्याही ग्रा.पं.चे काम पूर्ण होऊ शकले नाही.सदर निधी २०२१,२२ मध्ये दिल्याने हा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवून जि.प.कडून ग्रा.पं.ना प्रस्तावाच्या आधारावर त्वरित १० टक्के रक्कम देण्यासाठी सूचित करावे अशी विनंती आमदार सुभाष धोटे यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांकडे केली आहे.