प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर:- आज देशात महागाईने उग्र रूप धारण केले असून जनतेचे प्रचंड आर्थिक हाल दिसून येत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस च्या वाढत्या किमतीने देशातील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. खाद्यतेलाचे व इतर जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडलेले असून केंद्र सरकार व राज्य सरकार महागाई वाढवून जनतेचे मोठ्या प्रमाणात शोषण करत आहे असा आरोप वंचित चे नेते राजु झोडे यांनी केला.
कोरोनाच्या महामारीत लोकांच्या हाताला काम नाही व सरकार प्रचंड महागाई वाढवून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावत आहे. मोदी सरकार हे उद्योगपत्यांच्या हातातील बाहुले बनले असून उद्योगपत्यांच्या हिताचेच निर्णय हे निर्लज्ज सरकार घेत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व इतर वस्तूंचे भाव वाढवून जनतेचे शोषण करणारे सरकार हे इंग्रजांपेक्षाही जास्त लुटणारे सरकार आहे हे सिद्ध होते.
महागाईचा भडका असाच वाढत राहिला तर गोरगरीब व सर्वसामान्य जनतेत हाहाकार माजेल. सरकारने यावर तात्काळ उपाय योजना करावी व महागाई कमी करावी याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांना निवेदन पाठविण्यात आले.
जर महागाई विरोधात कोणतीही उपाययोजना केल्या गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी या वाढत्या महागाई विरोधात रस्त्यावर उतरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या नीती विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी दिला. निवेदन देतांना वंचितचे नेते राजू झोडे, संपतभाऊ कोरडे, सचिन तुपे, प्रथम दुपारे, स्नेहल साखरे, भगतसिंग झगडा, प्रदीप झामरे, निलजय गावंडे, महेंद्र नीवलवार, गौतम रामटेके, सिद्धांत पुणेकर, गुंजन वानखेडे, तथा वंचित चे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.