गोंदिया - आईवडिलांसाठी पोटचं मुल जीव की प्राण असतं. मात्र, या प्रेमळ नात्याला धक्का देणारी घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात घडली आहे. जन्मदात्या वडिलांनीच किरकोळ कारणावरून आपल्या चिमुकलीचा खून केला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. #News34
तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. मुलीला खाऊ खाण्यासाठी ५ रुपये न दिल्याने ती रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला 'जा मर' असे म्हणून तिला जोरात दारावर आपटले. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीचा नंतर मृत्यू झाला. विवेक विश्वनाथ उइके (वय २८) रा. लोणारा असे आरोपी पित्याचे नाव असून वैष्णवी विवेक उइके (वय १ वर्ष ८ महीने) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलीची आई वर्षा विवेक उके (२२) हिने तिरोडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी पिता विवेक विश्वनाथ उइके याला अटक केली आहे. याप्रकरणी तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुवते करीत आहेत.
वर्षा व आरोपी विवेक यांचे लग्न २०१८ मध्ये झाले. या दाम्पत्याला वैष्णवी ही मुलगी झाली. मात्र, पती दारू पिऊन सतत भांडण करत असल्याने व मारहाण करत असल्याने कंटाळून लग्नानंतर वर्षभरानंतर वर्षा ही माहेरी खडकी (पालोरा, ता. मोहाडी, जि. भंडारा) येथे वडील घनश्याम कंगाले यांच्याकडे राहायला गेली. दरम्यान, एके दिवशी विवेकने मेव्हणा राकेश घनश्याम कंगाले याला फोन करून पत्नी वर्षा व मुलीला लोणारा येथे आणून सोडण्यास सांगितले. त्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये वर्षा व आपल्या भाचीला राकेशने विवेककडे आणून सोडले. तेव्हापासून मुलीसह ती पतीकडेच राहत होती. वर्षा हिची सासू ताराबाई विश्वनाथ उइके (वय ५५) व दीर शुभम विश्वनाथ उइके (वय २५) हे दोघे वेगळे राहतात तर सासरे विश्वनाथ उइके (६०) हे कामानिमित्त बाहेरगावी असतात. वर्षा वनमजुरी करून आपला व चिमुकल्या मुलीचा उदरनिर्वाह करत होती. असे असतानाच मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.