वर्धा - संपूर्ण राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका खडबडून जाग्या झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वर्ध्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत वर्ध्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. #News34Chandrapur
वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. वर्धा जिल्ह्यात 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यानुसार शनिवार रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
या कालावधीत वर्ध्यातील वैद्यकीय सेवा वगळता दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहणार आहेत. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी, एसटी, ऑटोरिक्षा सेवा बंद राहील. त्याशिवाय जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहील. दुध डेअरी विक्री सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत सुरु राहील. एमआयडीसीतील आस्थापना सुरु राहतील. पेट्रोल पंप देखील बंद राहतील.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वर्ध्यात एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी फक्त 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली होती. यानंतर आता वर्ध्यात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
