News34 chandrapur
चंद्रपूर : महाराष्ट्राला राजमाता जिजाऊचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शिवबांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याकडून प्रेरणा घेवून हजारो, लाखोंच्या संख्येने या राज्यातील महिलांना आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व करण्याचे बळ मिळाले आहे. पण राज्यातील विद्यमान मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला संधी मिळाली नाही. ही बाब या राज्यासाठी भूषणावह नाही. म्हणून या राज्यातील तमाम थोर महिलांचे स्मरण करुन राज्य सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करुन त्यामध्ये महिलांना योग्य संधी द्यावी, अशी अपेक्षा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.
जागतिक स्तरावरील महिला दिनानिमित्त त्या सभागृहात बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या विसाव्या शतकाच्या सुरवातीला जेव्हा संपूर्ण जगातीलच सर्व महिलांना जगण्याचे साधे-साधे हक्क नाकारण्यात येत होते. अशावेळी १९०७-०८ दरम्यान कामगार क्षेत्रातील महिला असो किंवा सामाजिक क्षेत्रातील महिला यांनी आपल्या हक्कासाठी, विशेष करुन मतदानांच्या हक्कांसाठी लढा उभारला.
मुक्ताबाईच्या ओवी, बहिणाबाईच्या कविता, अहिल्याबाईं-ताराराणी- महारानी हिराई या विरांगणाचे शौर्य, सावित्रीमाई फुले आणि रमाबाई आंबेडकरांचा त्याग, अशा थोर स्त्रियांनी महाराष्ट्राच्या भूमीला कर्तृत्व संपन्न केले आहे. सभागृहाने महिलांना उन्नतीची द्वारे खुली करणारे अनेक एतिहासिक निर्णय घेतले आहेत. या सभागृहाने तयार केलेल्या धोरणांनी या देशाला सुद्धा दिशा देण्याचे काम आहे, अशी स्तुती आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
स्वातंत्र्यापासून या देशातील , या राज्यातील महिलांनी प्रगतीची मोठी झेप घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तरतूद केलेल्या हिंदू कोड बिल मुळे स्वातंत्र्योत्तर काळात महिलांना संधीची कवाडे खुली झाली. महाराष्ट्र राज्याने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पण, आजही आपल्या आजुबाजुला अनेक घटना घडत आहे. ज्यामुळे महिलांना खरच समाज आणि विशेष करुन पुरुष सन्मानाच्या आणि समानतेच्या नजरेने बघतात का, हे सुद्दा तपासले पाहिजे.
महाराष्ट्रा सारख्या राज्याच्या विधानसभेत जर एका सन्माननीय महिला आमदारासाठी आपल्या लेकराला स्तनपान करण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येत असेल तर या राज्यातील लाखोंच्या संख्येने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या भगिनींची काय अवस्था असेल. याचा विचार महिला दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे.
पुढे त्या म्हणाल्या, या देशातील नव्हे या राज्यातील शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नियमित महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा, योग्य वेतन यासारख्या सुविधा देण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनेत, खासगी शिक्षण संस्थेत संस्थामध्ये विद्याज्ञानाचे पवित्र काम करणाऱ्या महिला कंत्राटी तत्त्वावर असणाऱ्या महिलांची अवस्था अतिशय दयनीय आहे. या महिलांना प्रसुती रजा, योग्य वेतनमान, कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती व्यक्त करताना मला वेदना होत आहेत.
Assembly session
मागील तीन वर्षांपासून मी या सभागृहाची सदस्य आहे. परंतु माझ्यासकट या सभागृहातील कोणत्या सन्मानीय सदस्याने, संपूर्ण संभागृहाने या गंभीर मुद्द्यावर साधक-बाधक चर्चा करुन एखादा ठोस निर्णय घेतल्याचे किंवा एखादे अतिशय परिणाम कारक धोरण घोषित केल्याचे मला तरी आठवत नाही. एखाद्या नटीच्या तोकड्या कपड्यावर राज्यात चर्चा घडविली जाते. राजकीय पक्ष आंदोलन करतात, माध्यमे चर्चा करतात. परंतु अध्यक्ष महोदय आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आजही आमच्या माय माऊलींना परिस्थितीमुळे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे मिळत नाही. शेतकऱ्यांच्या महिलांना ठिगळ लावून अंग झाकावे लागते. यावर मात्र राजकीय पक्षांना बोलण्यासाठी सवड नाही. माध्यमांना चर्चा करायला वेळ नाही. एखाद्या राजकीय पक्षाने आंदोलन केलेले सुद्धा बघायला मिळत नाही.
Woman's day 2023
म्हणून या राज्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विशेष करुन खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कामाचे ठिकाणी सुरक्षा आणि सन्मान मिळाला पाहिजे. या दिशेने या सभागृहाने काहीतरी ठोस निर्णय घेवून राज्यातील आमच्या तमाम माता-भगिनींना महिला दिनाची भेट द्यावी, ही अपेक्षा व्यक्त केली.