मुंबई, दि. 28:- सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’ Umbrella App च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरीकांच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, नागरी सुविधा, आपत्कालीन मदत अशा अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर Click पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न असून, या मध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
येथील सह्याद्री अतिथीगृहात बारामती sahyadri नगरपरिषद, आयसीआयसीआय ICICI फाऊंडेशन, रेव्हमॅक्स टेलिकॉम, उन्नती डिजीटल या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, आयसीआयसीआय फौंडेशनचे विनीत रुंगटा, कौस्तुभ बुटाला उपस्थित होते.
DIGITAL BARAMATI
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवून आणली. त्यांनी त्या काळात दाखविलेली दूरदृष्टी, आज देशाला उपयुक्त ठरत आहे. देशातील आजची मोबाईल क्रांती, डिजिटल क्रांती राजीव गांधींनी रचलेल्या संगणक क्रांतीच्या पायावर उभी आहे. ज्या लोकांनी संगणकाला विरोध केला ते आता सत्तेत आहेत आणि डिजीटलायजेशन बाबत बोलत आहेत. संगणकामुळे बेरोजगारी वाढेल असं म्हणत विरोध केला गेला मात्र, उलट यामुळे रोजगार वाढला. पंतप्रधान नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या दूरदृष्टी आणि खुल्या आर्थिक धोरणामुळे आज अत्यंत कठीण समयी देशाची अर्थव्यवस्था तग धरू शकली याची ही आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिली. कुठलंही राज्य चालवायचे असेल तर कर प्रणाली उत्तम असली पाहिजे. त्यातील गळती थांबली पाहिजे, यासाठी तंत्रत्रान क्षेत्रातील लोकांनी पुढे येऊन सरकारला मार्गदर्शन करावे असं आवाहन ही अजित पवार यांनी केले आहे.
Deputy Cm Ajit Pawar
मी स्वतः सहकार क्षेत्रात काम करत असलेला एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे बँकींग क्षेत्रातील अडचणी मला जवळून माहिती आहेत. राज्यातील बँकींग क्षेत्राला ज्या काही अडचणी येतील त्या दूर करण्यासाठी आपण सदैव उपलब्ध आहोत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकींक क्षेत्रातील सर्वांनाच अधिक लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचं आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच दूरदृष्टी दाखवून काम उभं केले आहे, बारामतीतील विकासाचा ही राज्याने आदर्श ठेवलेला आहे, या ॲप मुळे विकासाची गती वाढेल असं मत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची गती वाखाणण्यासारखी आहे, ते सकाळी सहा पासून लोकांच्या सेवेत असतात आणि लोकांच्या तक्रारींचा निपटारा करत असतात. आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या सहकार्याने आकाराला आलेल्या या ॲप मुळे लोकांना सुविधा देण्यासाठी याच वेगाने तक्रारी आणि त्यांचा निपटारा याचा वेग वाढेल. असं मत कौस्तुभ बुटाला यांनी व्यक्त केलं.
बारामती नगरपरिषदेच्यावतीने ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’ची निर्मिती करुन नवे पाऊल टाकले आहे. या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून टेलीमेडिसिन अॅप, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ॲप, जीआयएस टॅगिंग या कामावर देखरेखीचं ट्रॅकिंग प्रणाली, फिनएक्सा हे प्रॉपर्टी मॅनेजमेंट संबंधीचं ॲप, स्थानिक व्यवसायांच्या जाहीरातींसाठी लोकऑफ ॲप, आपत्कालीन स्थितीत वैयक्तिक बचावासाठी एसओएस ॲप, जीआरएस हे तक्रार निवारण प्रणालीसंबंधीचं ॲप एकत्र उपलब्ध होणार आहेत.
मोबाईलच्या एका क्लिकवर सर्व ॲप उपलब्ध झाल्याने, बारामतीकरांना दैनंदिन गरजांसाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही. अर्ज देण्याचा, अर्जाची पोच घेण्याचा, संबंधितांना भेटून विनंती करण्याचा त्रास या ॲपमुळे वाचणार आहे. ॲपच्या माध्यमातून केलेल्या मागणी, विनंती, तक्रारीची नोंद डिजिटली आपोआप होईल. त्यामुळे अर्जाचा पाठपुरावाही ऑनलाईन करणेही शक्य होईल. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांचे जीवन, दैनंदिन व्यवहार, अधिक सहज, सोपे, सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी, हे अम्ब्रेला ॲप डाऊनलोड करावे, घरबसल्या नागरी सुविधा मिळवण्यासाठी या ॲपचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विनीत रुंगटा यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ बुटाला यांनी केले.