चंद्रपूर - वर्ष 2015 पासून चंद्रपूर महानगरपालिका मध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे कार्य सुरू झाले, मात्र कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी घंटागाडी व वाहन चालक यांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात आले.
कामगारांनी वेळोवेळी किमान वेतनाबाबत पाठपुरावा केला मात्र चंद्रपूर मनपाने प्रतिसाद दिला नाही, अखेर फेब्रुवारी महिन्यात कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले त्यावेळी मनपा आयुक्त, महापौर यांनी किमान वेतन देण्याचे आश्वासन दिले.
6 महिने उलटले असताना सुद्धा आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने कामगारांनी 2 ऑगस्ट पासून बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे, जोपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला वेतन देण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठेही कचरा संकलनाला जाणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.
कोरोना काळात कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील प्रत्येक घरी जात कचरा संकलन केला मात्र त्यांच्या या कार्याची मनपाने कधी दखल घेतली नाही.
मनपा आता कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या बेमुदत आंदोलनाला काय प्रतिसाद देणार हे कळेलच.