चंद्रपूर - यावर्षी विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू न झाल्यामुळे शालेय पोषण आहार योजना राबवली जाणार नाही तर प्रति विद्यार्थी निधी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते तात्काळ काढण्याचे आदेश 25 जून च्या पत्रानुसार देण्यात आले आहे मात्र कोरोना काळात पालकांना खाते काढायला बऱ्याच अडचणी येत असल्याने अशी सक्ती न करता पालकांचे खाते ग्राह्य धरण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शासनाला देण्यात आले.
बऱ्याच विद्यार्थ्यांचे खाते काढून आहे मात्र शासनाच्या 0 बॅलन्स विद्यार्थी बँक खाते योजनेचा बट्याबोळ करत बँकांनी या खात्यात बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड वसूल करणे, पासबुक न देणे, खाते बंद करणे अशी कामे बँकांनी केल्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी आज बँक खात्याविना आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाहीत तर काहींचे आधार चुकीचे असल्याने ते लिंक नाहीत, यासह आज कोरोना काळात खेड्यापाड्याच्या पालकांना शहरात येऊन खाते काढणे अडचणीचे होत आहे करिता शालेय पोषण आहार डी.बी.टी. योजनेसाठी पालकांचे खाते ग्राह्य धरण्यात यावे कारण नाहीतरी पालकच तो निधी काढून मुलांना आहार देणार आहेत मग खाते मुलांचेच असावे हा अट्टाहास का ? असा प्रश्न पालकांच्या वतीने शाळांना विचारला जात आहे.
करिता या सत्रात डी.बी.टी. शालेय पोषण आहार योजनेसाठी पालकांचे खाते ग्राह्य धरण्यात यावे व विद्यार्थी खाते काढायला मुदतवाढ देण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.शिक्षणमंत्री, मा.शिक्षक सचिव व मा.शिक्षक संचालक यांना पाठवले आहे.
