चंद्रपूर/ कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिकेची भूमिका महत्त्वाची ठरली. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविता आल्याने ही रुग्णवाहिका अनेकांसाठी देवदूत ठरली. मात्र, अशा भयावह स्थितीतही केवळ निधी न मिळाल्याने रुग्णवाहिका शोरुममध्येच धूळखात पडल्या आहेत. याला शनीचा शापच म्हणावं लागेल, असे चित्र सध्या चंद्रपूरात बघायला मिळत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे. मात्र, राजकीय स्वार्थ आणि कामाच्या अनास्थेमुळे रुग्णांना मृत्यूच्या दारात उभे राहावे लागत आहे. अशातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णवाहिका भेट दिल्याच्या बातम्या प्रकाशित करून घेतल्या. प्रसिद्धी मिळाली. पण, रुग्णवाहिका पोहोचल्या नाहीत. चंद्रपूर येथील नागपूर मार्गावर शनी मंदिर आहे. ये जा करणारे अनेक भक्त शनिदेवाला नतमस्तक होतात. कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडो, यासाठी मनोकामना केली जाते. पण, एखाद्या व्यक्तीच्या मनात पाप असेल तर शनिची वक्रदृष्टी पडते. याच शनिमंदिरासमोर फोर्स कंपनीची शोरुम आहे. येथील मोकळ्या मैदानात रुग्णवाहिका ठेवल्या आहेत. अधिक चौकशी केली असता गौङबंगाल पुढे आले. महाविकास आघाडीतील एका बङ्या नेत्याने घोषित केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी या रुग्णवाहिका आहेत. मोठ्या नेत्याकडून रुग्णवाहिका घोषित झाल्याने मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र कोरोणाची दुसरी लाट संपूनही या रुग्णवाहिका रुग्णसेवेत पोहोचू शकल्या नाहीत. गडचिरोली जिल्ह्यासाठी या रुग्णवाहिका असल्या तरी या चंद्रपुरातील एका शोरूम समोर त्या धूळखात पडलेल्या आहेत. या मोठ्या नेत्यांनी शोरूमचा निधी अद्याप पर्यंत जमा न केल्यामुळे त्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होऊ शकल्या नाहीत. यासोबतच एक रुग्णवाहिका चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या मतदार संघातील आहे. मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने येथे धूळखात पडलेली आहे. आज कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची मोठी गरज असतांना पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील एखादी रुग्णवाहीका अशी धूळ खात पडलेली असेल, तर काय म्हणावे?
अगदी शनि मंदिराच्या पुढेच असा प्रकार होत असल्याने संबंधित नेत्यांवर शनीची अवकृपा तर नाही ना, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.


रूग्णवाहीकांचे लोकार्पण करून पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आपली पाठ थोपटून घ्यावी.लोकांचा जीव धोक्यात घालू नये.
उत्तर द्याहटवा