चंद्रपूर/ प्रतिनिधी:
रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ इकोप्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहात गुरुवारी ११ व्या दिवशी सुमारे ३६ जणांनी आपल्या स्वतःच्या रक्तातून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले आहे. धर्मेंद्र लुनावत यांचा अन्नत्याग सत्याग्रह चा तिसरा दिवस आहे. आज साखळी उपोषणास नितीन रामटेके, राहुल कुचनकर, सचिन धोतरे, अमोल उत्तलवार, भारती शिंदे यांनी केले.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाला तलाव जलप्रदूषण चिंतेची बाब झाली आहे. तलावातील घातक प्रदूषित घटक भूजल प्रदूषित करित असल्याने परिसरातील नागरिकांना बाधा होत आहे. करिता पर्यावरणाचे संतुलन राखण्यास अस्तित्वास असलेल्या जलस्त्रोताचे संवर्धन करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी रामाळा तलावाचे संवर्धन खनिज विकास निधीतून करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. खासगी वैद्यकीय तज्ज्ञाच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी स्वतःचे रक्त संकलित केले, त्यांनतर कोऱ्या कागदावर रक्ताने शाईप्रमाणे पत्र लिहण्यात आले. या अनोख्या आंदोलनात तरुण, तरुणी आणि ज्येष्ठ महिलानी सहभाग घेतला. सेव रामाला, सेव चंद्रपूर असा संदेश या पत्रातून देण्यात आला असून, इको प्रो ने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.