चंद्रपूर : राज्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीवर राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्र सरकार वाढती आकडेवारीची स्थिती गांभीर्यानं घेत असल्याचे म्हटले आहे. राज्याला व एकूण अर्थकारणाला लॉकडाऊन परवडणारे नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मात्र लॉकडाऊन टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसेसमधील गर्दी कमी करणे आदी शक्यतांची पडताळणी केली जात असल्याचे ते म्हणाले. सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महत्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे व ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. येत्या काळात हे निर्णय अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.