यवतमाळ (आर्णी) - राज्यातील काही भागांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. यवतमाळमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी या ठिकाणी काल जोरदार वादळी वारा सुटला होता. हे वादळ इतके भयानक होते की ते थेट लोणी येथील सुनील राऊत यांच्या घरात घुसले.
सुनील राऊत यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घराचे बांधकाम केले होते. यावेळी त्यांनी घरावर लोखंडी अँगल टाकून पत्र्याचे छप्पर टाकले होते. यातील एका अँगलला त्यांनी त्यांच्या लहान मुलासाठी पाळणा बांधला होता.
काल वावटळ घरात शिरल्यानंतर त्या ठिकाणी सुनील राऊत यांचा दीड वर्षाचा मुलगा मंथन राऊत त्या पाळण्यात झोपला होता. वादळीवाऱ्याने राक्षसी रूप धारण करून घरावरील पत्र्यासह पाळणा तब्बल 60 ते 70 फूट उंच हवेत फिरवले. त्यानंतर काही वेळाने मंथनचा पाळणा आणि पत्रे खाली कोसळले.
यात दीड वर्षाच्या मंथनला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्याला तात्काळ यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही सर्व हृदयद्रावक घटना मंथनच्या आई-वडिलांच्या डोळ्यासमोर घडली. दरम्यान दीड वर्षाच्या मंथनच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

