राजुरा - तालुक्यातील पोलीस स्टेशन विरुर येथे 19 मे ला अनोळखी इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती विरुर पोलिसांना मिळाली असता त्यांनी कलम 174 अनव्ये गुन्हा नोंद केला.
सदर घटनेचा पंचनामा करीत असताना पोलिसांना यामध्ये संशयास्पद परिस्थिती जाणवली सदर मृत्यू हा आकस्मिक नसून खून आहे असा संशय बळावल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले असता त्यांनी तात्काळ सपोनि जितेंद्र बोबडे व पोउपनी संदीप कापडे यांच्या नेतृत्वात 2 पथक तयार केली.
दोन्ही पथकांनी घटनेची सखोल चौकशी केली असता मृतकांचे नाव व ओळख पोलिसांना पटली.
मृतक हा सिंधी येथे राहणारा असून 42 वर्षीय तिरुपती तानोबा धानोरकर अशी मृतकाची ओळख पटल्यावर पूर्ण परिसराचा बारकाईने तपास करण्यात आला.
मृतकांच्या शरीराचे रेल्वेच्या धडकेत चार तुकडे झाले होते, रस्त्यावर रक्ताचे डाग आढळून आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मृतक तिरुपती याच्या घरी जाऊन बघितले असता घरातील एका खोलीत दिवाणावर व आलमारी वर रक्ताचे डाग दिसून आले.
मृतक तिरुपतीचा मुलगा निखिल याच्या दुचाकीवर सुद्धा रक्ताचे डाग आढळले.
पोलिसांनी चौकशीसाठी निखिलला ताब्यात घेत विचारपूस केली मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, निखिलला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने वडिलांचा खून केला असल्याची कबुली दिली.
वडील तिरुपती यानी एक एकर जमीन विकल्याने बाप-लेकात जोराचे भांडण झाले होते म्हणून निखिल ने बंडीच्या उभारीने वडिलांचा खून केला, त्यानंतर त्याने वडिलांच्या मृतदेहाला कंबरेला बांधत रेल्वे रुळावर नेऊन टाकले.
सदर खून हा आत्महत्येचा प्रकार वाटावा म्हणून निखिलने वडिलांचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकला.
सदर खुनाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 2 तासात लावला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी संदीप कापडे, राजेंद्र खनके, महेंद्र भुजाडे, नईम पठाण, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण यांनी यशस्वीपणे पार पाडली.
